आशा सेविका निवडीला स्थगित करून पदभरती चौकशीची मागणी
पालोरा येथील आशा सेविका निवड प्रकरण
जवाहरनगर (भंडारा) :- मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील आशा सेविका नियुक्ती रद्द करून या पदभरतीची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी १०७ ग्रामस्थांचे स्वाक्षरीचे पत्र जिल्हा परिषद भंडारा चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
मोहाडी तालुक्यातील पलोरा येथे १६ जानेवारीला विशेष ग्रामसभा ठेवण्यात आली त्यात आशा सेविका पदभरतीचा विषय होता. ग्रामपंचयतीतर्फे नोटिस लाऊन तसेच लाऊडस्पीकर वरुन टिळक वॉर्ड मधील महिलांना माहिती देण्यात आली. सर्वानी आपले अर्ज १५ जानेवारी पर्यन्त सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या पदभरतीमध्ये समिती गठित करण्यात आली त्या समितीमध्ये सरपंच, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र करडी, ग्रामसेवक, यांचा समावेश होता.
त्यामध्ये अर्जाची छाननी करण्याचा कुठलाही वेळ काळ देण्यात आलेला नाही. कुणाचे अर्ज पात्र – अपात्र यासंबंधीत सुद्धा काहीही माहिती देण्यात आली नाही. तसेच पात्र उमेदवाराची यादी सांगण्यात आलेली नाही तसेच आक्षेप हरकतीचा कुठलाही वेळ काळ ठेवण्यात आलेला नाही तसेच जनतेला ग्रामसभेत काय करायचे होते त्यांची भूमिका काय याबाबत सुद्धा काहीही माहिती नव्हती. सरपंच, आरोग्य अधिकारी व ग्राम सेवकानी कुणालाही न ऐकता आक्षेप हरकती व सूचना न घेता उमेदवारांना व गावकऱ्यांना बोलू दिलेले नाही सरपंच यांनी कुठलाही निर्णय न देता ग्राम सेवकांनी निर्णय घोषित केला ही चुकीचे आहे. ते ग्रामसभा सदस्यांना समजलेले नाही कारण सभेचे अध्यक्ष हे सरपंच होते यावरून सरपंच नाममात्र आहेत की काय हा प्रश्न याठिकाणी उद्भवतो. सरपंचांनी अध्यक्ष असतांनाही कुठल्याही उमेदवाराची तसेच ग्रामसभा सदस्यांच्या आक्षेप हरकती व सूचना न ऐकता ग्रामसभेतून उठून गेले व ग्रामसभा गुंडाळली.
तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी शैक्षणिक पात्रता न पाहता म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रातील कागदपत्रे न पाहता त्यांच्या अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे (मूळ कागदपत्रे न पाहता ) त्यांना गुणांक दिले ज्यामुळे अन्य उमेदवारांवर अन्याय झालेला आहे. जोपर्यन्त कुणीही व्यक्ति वैद्यकीय क्षेत्रातील डिप्लोमा किवा डिग्री करत नाही तोपर्यंत डॉक्टर त्यांना अनुभवासाठी कसा आपल्या दवाखान्यात ठेवतो व त्यांना कशा पद्धतीने अनुभव प्रमाणपत्र देतो ही कोडेच आहे आणि वैद्यकीय अधिकारी यांनी कसे पात्र केले हे समजण्यापालीकडे आहे. अशा आशयाचे तक्रार अर्ज १०७ ग्रामस्थांचे स्वाक्षरीने मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,भंडारा,खंड विकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांना दिले आहे.