उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आणखी एक बॉम्ब राज्याच्या राजकारणात घडामोडीचे संकेत

माढा / नवप्रहार डेस्क
राज्यातील राजकारण सध्या मुंबईच्या पावसासारखे झाले आहे. कधी पावसाच्या साई बरसतील आणि कधी.ऊन पडेल याचा जसा मुंबईत नेम नसतो अगदी तसेच राजकारणात झाले आहे.सकाळी एका पक्षात असलेला व्यक्ती संध्याकाळी कुठल्या पक्षात जाईल याची काहीच गॅरंटी नाही. त्यातल्या त्यात माढ्यात घडणाऱ्या घडामोडीने देशाचे लक्ष वेधले आहे. अश्यातच आज येथे एका सभेला संबोधित करतांना फडणवीस यांनी जे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय मंडळी सह जनतेचे कान उभे झाले आहेत.
. विशेष म्हणजे या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप येण्याची शक्यता आहे. कारण माढ्यात निंबाळकर घराणं येत्या काळात एकत्र दिसणार का? असा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं. “मोदी है तो मुमकिन है. आमचा प्रयत्न सर्वांना एकत्रित करण्याचा असतो, विभाजन करण्याचा नसतो. आता काय-काय होतं हे पुढे पाहा”, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
देवेंद्र फडणवीस यांची आज अकलूज येथे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. अकलूजचे मोहिते पाटील हे भाजपमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात गेले आहेत. तसेच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवारही आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचं चांगलं वर्चस्व असलेल्या अकलूजमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडत आहे. “मला वाटतं आज अकलूजला कोणाचेही प्रवेश नाहीत. आमची आज सभा आहे. ज्याप्रमाणे माढ्याला सभा आहे, ज्याप्रमाणे सांगोल्याला सभा आहे, त्याचप्रमाणे अकलूजला सभा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असा वेगळा काही विचार करण्याचा आणि आम्ही तिथे सभा घेतोय हे आश्चर्य आहे, असं काही नाहीय”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘शरद पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण संपवलं तेव्हा…’
“प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो. शेवटी लोकांना दिसतंय ना, ज्यावेळी शरद पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळपास संपुष्टात आणलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहिलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की, त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलंय, अशी परिस्थिती नाही. पण मी त्यावर जास्त काही बोलणार नाही. त्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहिलो, आता त्यांना काय करायचं आहे, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘महायुतीला प्रचंड मतदान मिळालं’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा जिंकून येतील. विरोधी पक्षांकडून आताही वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी मांडल्या जात आहेत. त्या थिअरी त्यांच्याकरता गरजेच्या आहेत. कारण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही. त्यांच्या कॅडरमध्ये उत्साह दिसत नाही. त्यामुळे आपण कुठेतरी जिंकतोय, अशा अफवा सोडल्या तर कदाचित आपला कार्यकर्ता कामी लागेल, असं त्यांना वाटतं. मतदानाचे दोन टप्पे झाले आहेत. मोदींनी काल सांगितलं की, दोन टप्प्यांमध्ये आम्ही जिंकतोय. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे. दोन्ही टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळालं आहे आणि आमचा चांगला विजय होणार आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज ठाकरेंची सभा कुठे-कुठे होणार हे आम्ही नक्कीच घोषित करु, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.