नाचण्यावरून दोघात वाद ; दोघेही जीवनातून बाद
नेवादा / नवप्रहार न्यूज नेटवर्क
पती पत्नीत भांडण हा काही नवीन विषय नाही.पण कधी कधी एखादी शुल्लक गोष्ट मनाला लागली की यापैकी कोणीतरी टोकाचे पाऊल उचलतो आणि मृत्यूला कवटाळतो. अशीच एक घटना समोर आली आहे. यात लग्नात नाचण्यावरून पती पत्नीत वाद झाला. यामुळे पत्नी इतकी संतापली की तिने चालत्या बाईक वरून कालव्यात उडी घेतली. हे पाहून नवऱ्याने देखील कालव्यात उडी घेतली.त्यात दोघांचा मृत्यू झाला.
दोघा नवरा बायकोने कालव्यात उडी घेतल्याचं कळाल्यानंतर जीवरक्षकांनी या दोघांचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अजूनपर्यंत दोघांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही अंधार झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं आहे. आज सकाळी पुन्हा या दोघांचा शोध घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे नवरा बायको साडूच्या घरी लग्नाला गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. लग्नाहून परततानाही दोघांचं भांडण सुरूच होतं. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याने संतप्त झालेल्या पत्नीने चालत्या बाईकवरून उडी घेतली. त्यानंतर धावतच तिने कालव्यात उडी घेतली. पत्नीने कालव्यात उडी घेतल्याने नवऱ्यानेही क्षणाचा विचार न करता कालव्यात उडी घेतली.
मानसिंह असं या व्यक्तिचं नाव आहे. तो माधौगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील नेवादा येथील रहिवासी आहे. त्याचा साडू बिलग्राम पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील अख्तियारपूर येथे राहतात. साडूच्या घरी लग्न समारंभ होता. या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरिता मानसिंह त्याची पत्नी आरतीसोबत आला होता.
लग्न सोहळ्यात आल्यानंतर आरती तिच्या बहिणींसोबत लग्नात डान्स करत होती. त्यावर मानसिंह याने आरतीला हटकले. पण तरीही आरती डान्स करत होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे दोघेही आपल्या घराकडे जायला निघाले होते. बाईकवरून जात असतानाही दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडत होती. दोघे शारदा कालव्याच्या पुलावर आले होते. त्यावेळी अचानक दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. गाडी पुलावर आल्याने गाडीचा वेगही कमी झाला. तिच संधी साधत संतापलेली आरती बाईकवरून उतरली आणइ तिने तडक कालव्यात उडी घेतली.
कालव्यात प्रचंड पाणी होतं. आरतीने उडी घेतल्याने मानसिंहनेही कालव्यात उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांसोबत मानसिंह आणि आरतीच्या कुटुंबीयांनी पुलावर धाव घेतली. जीवरक्षकांच्या मदतीने या दोघांचाही शोध सुरू आहे. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. अप्पर पोलीस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत तपास सुरू केला आहे.