नवेगाव-नागझिरा वन्यजिव व्याघ्र प्रकल्प पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
अभाअरण्यात दोन नव्या वाघीणींचे आगमन…
राजू आगलावे / जिल्हा प्रतिनिधी
भंडारा
संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून, शनिवारी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्यात ब्रम्हपुरी भुभागातील
दोन वाघिणींचे स्थानांतरण करुन, वनमंत्री सुधीर मुनंगट्टीवार यांचे उपस्थितीत दोन वाघीनींना सोडण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त असुन, या दोन वाघिणींच्या आगमनामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल,असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
पुढे बोलतांना वनमंत्री सुधिर मुंनगटीवार म्हणाले, सदर अभयारण्यात सोडण्यात आलेल्या दोन वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. जगात चौदा देशात वाघांचा अधिवास आहे. वाघांची सर्वाधिक संख्या ही भारतात व त्यातही महाराष्ट्र विदर्भात आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये १९० वाघ होते तर २०१९ च्या गणनेत ते ३१२ झाले आणि आता ५०० च्या वर वाघांची संख्या आहे. यात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. याचाच अर्थ विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल झाले असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत सरकारने पहिल्या टप्प्यात पाच वाघांचे स्थानांतरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार शनिवारी नवेगाव-नागझिरा प्रकल्पात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. या ठिकाणी ११ वाघ असून वीस वाघ अधिवास क्षमता आहे. करिता वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांसाठी नवेगाव-नागझिरा आकर्षण केंद्र ठरणार आहे.पुढील टप्प्यात तीन वाघांचे स्थानांतरण करण्याचा मनोदय वनमंत्र्यांनी व्यक्त केला. नवेगाव नागझिरा प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्थानिक ४०० युवकांना प्रशिक्षण तसेच शंभर वाघमित्र नेमले आहेत. वाघमित्रांना दोन हजार रुपये सन्माननिधी देण्यात येतो. तसेच पर्यटकांसाठी अत्याधुनिक सहा वाहने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सारस संवर्धनासाठी ६२ कोटींचा आराखडा बनविण्याच्या न्यायालयाच्या सूचना आहेत त्यावर काम सुरू असल्याचे मंत्री म्हणाले. पाच वाघांचे स्थानांतरणाबाबत गेली दहा महिने वनविभाग या विषयावर काम करत होते. याव्यतिरिक्त माळढोक व गिधाड पक्षी संवर्धन सुद्धा गरजेचे असून त्यासाठी वनविभाग आराखडा बनवित आहे. विशेष म्हणजे चिमण्या आता कमी दिसतात. त्यातही येणाऱ्या पिढीला चिमणी केवळ कथा कवितेतूनच समजू नये म्हणून चिमण्यांचे संवर्धन करणे सुद्धा आवश्यक आहे असे ते आवर्जुन म्हणाले. कुरण विकास करणे व पाणवठे वाढविणे यावरही काम सुरू असुन, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात स्थित असून 2013 मध्ये अधिसूचित करण्यात आलेला हा व्याघ्र प्रकल्प आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हा देशातील 46 वा व राज्यातील 5 वा व्याघ्र प्रकल्प असून प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापना करण्यात आलेला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे गाभा क्षेत्र 656.36 चौ.कि.मी. आहे तसेच 1241.24 चौ. कि.मी. बफर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. ऑल इंडिया टायगर ईस्टिमेशन 2022 च्या अहवालानुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये किमान 11 प्रौढ वाघ असल्याचे नमूद आहे. सध्यस्थितीत व्याघ्र क्षेत्र हा कमी व्याघ्र घनतेचा भूभाग असून, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात 20 प्रौढ वाघ वास्तव्य करण्याची क्षमता आहे.
वाघांचे संवर्धन व स्थानांतर (Conservation Translocation of Tigers) या उपक्रमा अंतर्गत एकूण 4-5 मादी वाघिणींना ब्रह्मपुरी भूभागातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरीत करणे प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात 2 मादी वाघिणींचे नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे स्थलांतर करण्यात आले आहे. दोन्ही वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभा भागात सोडण्यात आले असुन वाघिणींना सोडल्यानंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर व व्हिएचएफ (Satellite GPS collar व VHF) च्या सहाय्याने दोन्ही वाघिणींचे 24 x 7 सक्रियपणे सनियंत्रण केले जाईल. संपूर्ण सनियंत्रणाचे कार्य हे कमांड आणि कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रीत केले जाणार आहे. या दोन स्थलांतरीत वाघिणींच्या निरीक्षणानंतर व उर्वरित घटक लक्षात घेऊन इतर मादा वाघांना टप्प्या-टप्प्याने स्थानांतरीत केले जाईल. या उपक्रमामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ राखीव क्षेत्रात भविष्यात वाघाच्या संखेत वाढ होवून या प्रकल्पात पर्यटनाला चालना मिळू शकते व स्थानिकांना उपजिविकेच्या संधी निर्माण होतील तसेच जास्त व्याघ्र संख्या असलेल्या ब्रह्मपुरी भूभागातील मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे, अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. जितेंद्र रामगावकर, नक्षल सेलचे विशेष पोलीस महासंचालक संदीप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव-नागझिराचे जयरामेगौडा,उपवनसंरक्षक कुलराज सिंह गोंदिया, भंडाराचे उपवनसंरक्षक राहूल गवई, गोंदियाचे उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र साकोलीचे पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर तसेच मानद वन्यजीव रक्षक निसर्गप्रेमी यांचेसह गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार वनरक्षक अरविंद बडगे यांनी मानले.