अधिकारानुरूप उपदेश करणारी गुरुकिल्ली गाथा

श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
बाळासाहेब नेरकर कडून
उपदेश अधिक उपासना बरोबर फल हे उपदेशाचे समीकरण असल्याने उपासना संपन्न महात्म्यांचा उपदेश फलद्रूप होतो. किंबहुना त्यांच्याच प्रबोधनातून समाजाचे परिवर्तन होताना दिसून येते. कारण ते एकच उपदेश सगळ्यांना , सगळे उपदेश एकाला आणि सगळे उपदेश सगळ्यांना कधीच करीत नाहीत.तर प्रत्येकाच्या अधिकाराचा विचार करूनच ते त्याला उपदेश करीत असतात. किंबहुना जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा अधिकारानुरूप उपदेश करणारी गुरुकिल्लीच असल्याचे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित गाथा पारायण तथा प्रवचन ज्ञानयज्ञ सप्ताहातील सहावे पुष्प गुंफीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वारकरी संत हे एकच उपदेश सगळ्यांना कधीच करीत नसल्यामुळे त्यांच्या उपदेशात बऱ्याचदा तफावत असल्याचे निदर्शनास येते . वास्तवात हा त्यांच्या वाङ्गमयातील दोष नसून, सर्वोत्कृष्ट गुण आहे. कारण अधिकार भिन्नतेमुळे उपदेश भिन्नता सुद्धा करावीच लागते. तर यांना काहींचा अधिकार त्यांच्या बोलण्यातून , वागण्यातून आणि चालण्यातून लक्षात येतो. असे अनेक प्रमाण व दृष्टांत देऊन महाराजांनी आपल्या विनोद पूर्ण भाषेतून उपस्थितांना उपरोक्त विषय सहज पटवून दिले. आणि रात्री पार पडलेल्या कीर्तनामध्ये महेश महाराज मते यांनी संतांच्या संगतीत काय लाभ होतो , त्या करिता फक्त त्यांचे दास्यत्व जर स्विकारले तर ते कल्पांती न संपणारी कृपा करतात . आणि देवाला उत्तम वाटणारी गोष्ट जर काय असेल तर ती संत सेवा आहे . आपण कधीच संत सेवेत अंतर पडू देऊ नका . असे मत त्यांनी संत वचनांच्या आधारे मांडल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.