धानपीक कापणी व मळणी जोमात
शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु*
खरेदी केंद्र सुरू होण्याची चिन्हे दिसेनात..!
भंडारा / चंद्रकांत श्रिकोंडवार
पालांदूर चौ. परिसरातील खरिपातील धान पिकाचा हंगाम जवळजवळ अंतिम टप्प्यात आला आहे.धान पट्ट्यात हलक्या व मध्यम धान पिकाची कापणी व कापलेल्या धान पिकांच्या पेंढ्या बांधणे यासह मळणीच्या कामांनाही वेग आला आहे. हिवाळ्याची सुरुवात झाल्याने हळूहळू थंडीची चाहूल असतानाही मजूर वर्ग आपल्या दैनंदिन दिनचर्येला न चुकता सामोरे जाताना दिसत आहेत.
लाखनी तालुक्यातील प्रत्येक शेतशिवारात व परिसरात धानपीक कापणी व मळणीची कामे जोमात सुरू आहेत.आधुनिक युगात शेतकरी जलद गतीने कामे करण्यासाठी सरसावला आहे.महिला मजूर दिवसा कडक उन्हातही धानपीक कापणीच्या कामात व्यस्त आहेत.हुंडा पद्धतीने चार हजार रुपये प्रतिएकर कापणी व बांधणी केली जात आहे.तर ३०० ते ४०० मजुरी रुपये ठरलेली आहे.महिला व पुरुष मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने,मजूर वर्गात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.दिवाळीनंतर जास्त कालावधीच्या भारी धान पीक कापणीला वेग येणार आहे.
धान पिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील बांध्यात कापून ठेवलेल्या धान पिकाच्या कळपा सुकल्यानंतर त्यांची बांधणी करावी लागते.यासाठी कमीतकमी चार-पाच दिवसांचा
कालावधी लागतो.बांधणी केलेल्या धानाच्या कळपा मळणीसाठी एकत्रितपणे करून धान पिकाचे पुंजणे तयार केले जाते.सध्यास्थितीत कापणी,बांधणी व मळणीच्या कामात शेतकरी व मजूर व्यस्त दिसत आहेत. हलके धान शेतकऱ्यांनी मळणी
करून घरी आणले आहे.काही शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने रस्त्यावरच उघड्यावर ठेवले आहे.दिवाळी सण प्रत्येक शेतकरी साजरा करीत असतो.असे असताना धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी नाराज असल्याचे दिसून येत आहेत.
रकाना १.
*व्यापाऱ्यांकडून लूट सुरूच*
धानाची शेती करण्यासाठी खर्च झाला आहे.अनेकांनी बचत गटातून कर्ज काढून धानाची शेती केली आहे.आता पैसे परत करायचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विकण्याची घाई झाली आहे.दुसरीकडे केंद्र सुरु झाले नाही.त्यामुळे कमी किमतीने धान खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे सत्र सुरूच आहे.
*रकाना२*
*खासगी व्यापाऱ्यांचे धान खरेदी परवाने तपासणे गरजेचे*
पालांदूर परिसरासह संपूर्ण लाखनी तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी धान खरेदी करण्यासाठी एक प्रकारे स्पर्धा सुरू झाली आहे.याकरिता काही व्यापाऱ्यांना धान खरेदी करण्याकरिता परवाने सुध्दा दिले असल्याची माहिती आहे. कित्येकांकडे परवानेही नसल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र संबंधित विभागाकडून या परवान्यांची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हे व्यापारी शेतकऱ्यांची अद्यापही लूट करत असल्याचीही शक्यताही नाकारता येत नसल्याने संबंधित विभागाने ह्या धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवान्याचे नूतनीकरण झाले की नाही किंवा कसे?याची तपासणी करून परवाने न आढळल्यास ठोस व दंडात्मक कारवाई करण्याचे गरजेचे असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.