पूर परिस्थीतीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्याच्या दृष्ट्रीने आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी
आपत्ती विषयक कार्यरत यंत्रणांच्या कामाचा
जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
भंडारा / जी.प्र.
येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून बरेचदा पूर परिस्थीती उदभवते.पूरामुळे विहीर खचणे,त्यातील पाणी दूषित होणे ,तसेच अन्य जलस्त्रोतही मोठया प्रमाणावर प्रदूषित होतात.2020 व 2022 या वर्षी उदभवलेल्या पूर परिस्थीतीवेळेसचा अनुभव लक्षात घेता यावर्षी पाणीपुरवठा विभागाने पूर परिस्थीतीत नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्ट्रीने आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.
आज नियोजन सभागृहात आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फें आयोजित मान्सुनपुर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील ,प्रकल्प संचालक,ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद विवेक बोंन्द्रे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी 27 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्तांवर चर्चा करण्यात आली.बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी पीपीटीव्दारे विभागांचे सादरीकरण केले.
मान्सुनपूर्व आढाव्यात शहरी व ग्रामीण भागातील नालेसफाई प्राधान्याने पूर्ण करावी.तसेच महावितरणने विजेच्या तारांवर असणा-या झाडांची कापणी करावी.तसेच आवश्यक तेथे विदयुत वितरण प्रणालीतील दोष निवारण करण्याची सूचना त्यांनी केली.
पूर परिस्थीतीमुळे बाधित नागरिकांना निवारागृहात हलविण्यात येते.मात्र या निवारागृहात त्यांना पिण्याचे शुध्द पाणी व अन्य मुलभुत सुविधा मिळण्यासाठी स्थानिकस्तरावर तहसीलदारांनी निर्णय घ्यावेत.परिसरातील शाळा महाविदयालयांच्या प्राचार्याची बैठक घ्यावी.सर्व तहसीलदारांनी गावपातळीवरील आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्यात ग्रामस्थ,अशासकीय संस्थाना समाविष्ट करून घ्यावे.पूर प्रवण पूल व नदयांच्या धोका पातळीबाबत संदेशाचे फलक तयार करून लावावेत.
पूर परिस्थीतीत कमीत कमी वेळेत होमगार्ड उपलब्ध होण्याच्या दृष्ट्रीने पोलीस विभागाने कार्यवाही करावी.पुराबाबत,तसेच पावसाच्या अलर्टबाबत कींवा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत त्या भागातील लोकप्रतिनीधींना अवगत करण्यात यावे,अशी सूचना जिल्हाधिका-यांनी केली.आरोग्य विभाग व साथरोग नियंत्रण विभागाने त्यांच्या नियंत्रण कक्षाची माहिती माध्यमांव्दारे नागरिकांपर्यत पोहोचवावी.