शेतातील धान पिकाला पाणी देताना विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचखेडा येथील घटना…
राजु आगलावे/भंडारा
नव प्रहार/जिल्हा प्रतिनिधी
शेतावर बोरवेलद्वारे धान पिकाला पाणी देताना विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक मंगळवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुमारास भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचखेडा येथे घडली. मुनेश्वर उर्फ बबलू महादेव सेलोकर वय ४७ वर्ष, रा.चिचखेडा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहीती नुसार मुनेश्वर सेलोकर यांची चिचखेडा गावात घराला लागूनच शेती आहे. ते मंगळवारी सकाळी उठले आणि त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी बोरवेल सुरू केली. दरम्यान बोरवेलला विद्युत पुरवठा करणारा प्लास्टीक वायर पाण्यावर लोंबकळत असल्याने दिसुन आल्याने त्यांनी तो वायर वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर वायर कटलेला असल्याने त्यांना विजेचा जबर धक्का लागून ते जागीच कोसळले. प्रकार पाहताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यामागे दोन तरुण मुले, पत्नी आहे. आज बुधवारला त्यांचे पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.