मुदती पूर्वीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ?

अधिकाऱ्यांनी दिले सूचक संकेत , हालचाली वाढल्या
विरोधकांच्या हालचाली आणि मागील काही काळात काही राज्यात मिळालेले अपयश या मागील कारण असल्याची चर्चा
नागपूर / विशेष प्रतिनिधी
येणाऱ्या मे महिन्यात मोदी सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. मागील काही काळात देशात घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि राजकीय वातावरण पाहता मोदी सरकार मुदती पूर्वीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेऊ शकते असे अधिकाऱ्यांचे सूचक विधान आणि हालचाली पाहता समजत आहे.
पुढील वर्षी मे महिन्यात केंद्रातील मोदी सरकारचा कार्यकाळ संपत आहे. मोदी सरकारच्या कामकाजाबाबत कुठे समाधान तर काहींकडून नाराजी व्यक्त होत आहे. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येत आहे. तर भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी विरोधकांकडून रणनीती तयार करण्यात येत आहे. केंद्र सरकाराच्या काही गोष्टी विरोधात जाण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य भाजपकडून गेले. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
मोदींचा करिश्मा कमी होत असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबर २०२३ ते जानेवारी२०२४ या काळात पाच राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ संपत आहे. यात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरमचा समावेश आहे. यात मध्यप्रदेशमध्ये भाजपची तर छत्तीसगड व राजस्थानमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. परंतु मागील लोकसभा निवडणुकीत या तीनही राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाळ्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत उलट परिणाम झाल्यास त्याचा फटका लोकसभेत बसण्याची भीती भाजपला आहे. लोकसभा निवडणुका लवकर घेण्यावर वरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. त्यामुळे या पाचही राज्यांच्या निवडणुकांसोबतच लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. किंवा लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत निवडणूक विभागाशी संबंधित वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना मिळाल्याचे समजते.
निवडणूक प्रशिक्षण
निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना नुकतेच पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यात लोकसभा निवडणूक मुदतपूर्व होण्याचे संकेत अधिकाऱ्यांना देण्यात आले. नियमित वेळेत लोकसभा झाल्यास महाराष्ट्राच्या निवडणुका सोबत होतील.
त्या दृष्टिकोनातून निवडणूक कार्यक्रमाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार यादी अपडेट करून नवीन मतदार नोंदणी व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शक्यतो कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नका
निवडणुकीची पूर्व तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीशी संबंधित अनेक माहिती कर्मचाऱ्यांना असते. त्यामुळे निवडणूक विभागातील तृतीय व चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या शक्यतो करू नका, अशा सूचना शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात.