आगामी निवडणूक भाजपा साठी वैऱ्याची रात्र, ३३ जागां अडचणीच्या

मुंबई / नवप्रहार डेस्क
राज्यात पुढील दोन महिन्याच्या अंतरावर निवडणुकीचे बिगुल वाजू शकते. अश्यात सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यांची मोर्चेबांधनी सूरु आहे. एकांदरीत विचार करता राज्यात वर्तमान राजकीय परिस्थिती फार काही चांगली नाही. प्रत्येक पक्षाला बंडखोरीने ग्रासले आहे. त्यामुळे मतदार कोणत्या बाजूने काल देतील हे निश्चित सांगता येत नाही. पण सर्वे करणाऱ्या अनेक माध्यमाकडून वेगवेगळे भाकीत वर्तविण्यात येत आहेत. यात सर्वात जास्त तोटा मागच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपा ला बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडली होती. या दोन्ही पक्षांचा एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधात आहेत. त्यामुळे या दोन पक्षांपासून चार पक्षांची निर्मिती झाली आहे. या राजकीय परिस्थितीमुळे विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अर्थात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय घडामोडी घडतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच, पण या निवडणुकीत आहे तशी राजकीय परिस्थिती असल्यास प्रचारादरम्यान नैतिक आणि अनैतिकतेच्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप केले जाऊ शकतात. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्या पक्षाकडे किती जागांवर आव्हान आहे, याबाबत राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती होती. पण तरीदेखील दोन्ही पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात बंडखोर उभे केले होते. त्याचा फटका त्यांना काही मतदारसंघांमध्ये बसला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी जास्त आग्रही राहिले. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांची युती अधिकृतपणे तुटली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. पण हे सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळलं. यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत गेली. या राजकीय परिस्थितीमुळे मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी महत्त्वाचं विश्लेषण केलं आहे.
राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर काय म्हणाले?
राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी मोठा दावा केला आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर ३३ मतदारसंघात अडचण निर्माण होवू शकते. कारण गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागांपैकी २९ जागा भाजपने राष्ट्रवादी समोरच्या जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या ५४ जागांपैकी २५ जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटासमोर समोर आहेत. भाजप समोर ३३ जागांवर अडचणी आहेत. त्यामुळे शरद पवारांनी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. भाजप नेते समरजीत घाडगे हे त्याचंच उदाहरण आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याशी पण संपर्क केला. हर्षवर्धन पाटील पक्षात जाणार नाहीत. मात्र अपक्ष निवडणूक लढवू शकतात. २००४ ला राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पुन्हा निर्माण होवू शकते”, असा मोठा दावा प्रशांत आहेर यांनी केला.