त्या दोघांच्या घरातून सापडले बॉम्ब बनविण्याचे साहित्य

स्वतःला ग्राफिक्स डिझायनर भासवित होते.
दोघांचे शिक्षण 12 पर्यंत ही झाले नसल्याचे उघड
पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क
एटीएस कडून अटक करण्यात आलेल्या दोन दाशस्तवाद्यांकडून कोंढव्यातील घरातून ड्रोन, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, गुगलवरून घेतलेली कुलाबा येथील छाबडा हाउससह इतर संवेदनशील स्थळांची मोबाइलमधील छायाचित्रे आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केल्याची माहिती राज्य दहशतवादीविरोधी पथकाकडून (एटीएस) देण्यात आली.
दरम्यान, फरार झालेल्या तिसऱ्या दहशतवाद्यापर्यंत पोचण्याचा ‘एटीएस’चा प्रयत्न सुरू असून, त्याच्या साक्षीदाराचे नाव निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.
मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेलेहे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ‘एटीएस’ने या प्रकरणात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) याला अटक केली. त्यानंतर पठाणला आर्थिक रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा) याला रत्नागिरीहून शनिवारी अटक केली आहे.
आठवडाभरात महत्त्वाचे धागेदोरे हाती –
या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक केली आहे. तसेच, तपासात इतर काहीजणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात येत आहेत. दहशतवाद्यांनी ड्रोनमधून घेतलेले चित्रीकरण न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. तपासात येत्या आठवडाभरात महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील, असे ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी सांगितले.
ते दोघे ग्राफिक डिझायनर नव्हते
दहशतवादी हे स्वत:ला ग्राफिक डिझायनर असल्याचे भासवीत होते. परंतु त्यांचे प्रत्यक्षात बारावीपर्यंतही शिक्षण झालेले नाही. तरीही ते प्रशिक्षित दहशतवादी असून, त्यांनी बॉम्ब तयार करण्याचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. ते कोंढवा परिसरात नाव बदलून राहत होते.
अदनान अली अन॒ दहशतवाद्यांचे ‘कनेक्शन’!
इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात ‘एनआयए’ने अटक केलेल्या डॉ. अदनान अली सरकार आणि पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांचे ‘कनेक्शन’ अद्याप समोर आलेले नाही. परंतु यापुढील तपासात नेमके काय निष्पन्न होईल, हे सांगू शकत नाही, असे ‘एटीएस’कडून सांगण्यात आले.
लॉज, हॉटेलचा वापर नाही
या दहशतवाद्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील जंगलात बॉम्बस्फोट घडविण्याचे प्रात्यक्षिक घेतले. ते बाहेर राहण्यासाठी लॉज, हॉटेलचा वापर करीत नव्हते. त्यामुळे त्यांनी राहण्यासाठी तंबूचा वापर केला होता.