शेती विषयक
भोगवटदार २ च्या जमीनी आता होनार भोगवटदार १

मुंबई / विशेष प्रतिनिधि
राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना विविध शासकीय स्कीम अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या जमिनी ‘वर्ग-२’ मधून ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतरित करण्याबाबतचे धोरण ३१ मार्च २०२६ पर्यंत जाहीर केले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात माजी सैनिकांना देण्यात आलेल्या सीलिंग जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ करताना आकारल्या जाणाऱ्या अधिमूल्यात सवलत देण्याची मागणी सदस्यांनी केली होती. सध्या या जमिनी वर्ग-२ प्रकारात असल्यामुळे त्यांचे हस्तांतरण किंवा व्यवहार करण्यावर काही कायदेशीर मर्यादा लागू आहेत.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या जमिनी ‘फ्री-होल्ड’ करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. यासंबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच धोरण जाहीर केले जाईल.
अधिमूल्यात दिलासा देण्याचा निर्णय
या जमिनींचे वाटप प्रामुख्याने भूमिहीन शेतकरी, शेतमजूर आणि माजी सैनिकांना करण्यात आले असल्याने त्यांच्यावर आर्थिक भार पडू नये, याची सरकार विशेष काळजी घेणार आहे.
नझुल जमिनींच्या रूपांतरणासाठी ज्या पद्धतीने कायदे आणि दर निश्चित करण्यात आले आहेत, त्याच धर्तीवर या जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी किमान अधिमूल्य आकारले जाईल. यामुळे माजी सैनिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरकतींचा विचार करून अंतिम धोरण
या जमिनींच्या रूपांतरणासाठी १४ जानेवारी २०२६ रोजी नियमांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ११ फेब्रुवारीपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करण्यात आला आहे.
