भिवंडीत इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली दबून 2 लोकांचा मृत्यू ; पाच लोक गंभीर
भिवंडी / नावप्रहर मीडिया
इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून 2 लोकांचा मृत्यू तर पाच लोक जखमी झाले आहेत. घटना भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरातील आहे. मध्यरात्री ही घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना माहिती घडताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
दोन मजली इमारतीच्या मागच्या बाजूचा भाग पूर्णतः कोसळला आहे. ज्यामध्ये अनेक जण इमारतीच्या ढिकाऱ्याखाली दाबले आहेत. ही घटना माहिती घडताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर भिवंडी अग्निशमाक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केलं. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सहा जण अडकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या सहाही जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्याची मोहीम अग्निशमाक दलाच्या जवानांनी हाती घेतली. यामध्ये चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात असलेल्या या इमारतीला 40 ते 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं या इमारतीला दोन वेळा नोटीसा देखील बजावण्यात आल्या असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्याने दिली आहे. शिवाय या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. इमारत धोकादायक असताना देखील या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम महानगरपालिकेचे होतं, परंतू महानगरपालिकेने फक्त नोटिसा बजावून आपले हात झटकले होते. खरंतर महानगरपालिकेने योग्य वेळी जर ही इमारत खाली केली असती तर आज या इमारत दुर्घटनेत दोघांचा बळी गेला नसता.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात शेकडो धोकादायक इमारती आहेत आणि यामध्ये हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. अशावेळी महानगरपालिकेनं फक्त नोटिसा बजावून आपले हात झटकण्याचा काम करत असल्याचे दिसून येत आहे. याआधी देखील इमारत दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. महानगरपालिका धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना काढण्यात असमर्थ दिसत आहे. तर मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले की, ही अतिशय दुखद घटना असून या इमारतीचे स्ट्रक्चर कसे कोसळले याची चौकशी करण्यात येईल आणि यामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
भिवंडी अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले आहे. मातीच्या ढिगाऱ्या खालून सहा जणांना बाहेर काढले आहे. चार जण जिवंत होते तर दोघांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती भिवंडी अग्निशामक दलाचे अधिकारी राजेश पवार यांनी दिली आहे.