पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क
कोकणात जाण्यासाठी निघालेली कार नीरा – देवधर धरणात कोसळल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. घटना वारवंड गावाजवळ शनिवारी घडली. या दुर्घटनेत एकजण जखमी झाला असून, मृतांमध्ये एका महिलेसह तिघांचा समावेश आहे. भोर- महाड रस्त्यावरून ही कार कोकणा कडे जात असतांना सदर अपघात घडला आहे.
मोटारचालक अक्षय रमेश धाडे (वय २७, रा. रावेत, पिंपरी-चिंचवड), स्वप्नील शिंदे (वय २८), हरप्रीत (वय २८) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. स्वप्नील शिंदे याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली. अपघातात संकेत वीरेश जोशी (२६, रा. बाणेर) हा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मरण पावलेली महिला हरप्रीत हिचे पूर्ण नाव आणि पत्ता समजू शकला नाही.
याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय, स्वप्नील, हरप्रीत आणि संकेत शनिवारी सकाळी कोकणात पर्यटनासाठी निघाले होते. भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटातून जात असताना वारवंड गावाजवळ एका वळणावर समोरुन आलेल्या वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात मोटारचालक अक्षय याचे नियंत्रण सुटले आणि मोटार १५० ते २०० फूट उंचीवरुन नीरा-देवघर धरणात कोसळली. शिरगाव येथील नीलेश पाळे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रेखा वाणी, तहसीलदार सचिन पाटील, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन भोर, सह्याद्री रेस्क्यू फोर्स व स्थानिक हिर्डोशी, वारवंड आणि शिरगाव येथील ग्रामस्थांनी मोटारीतील मृतदेह बाहेर काढले.