पालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे आझाद नगर वसाहतीतील घरे जलमग्न होण्याचा धोका
नवप्रहार डेस्क हंसराज भंडारा ✍️
शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये मेंढा रोड आझाद नगर वसाहत परिसरातून गेलेल्या मुख्य आणि मोठ्या नाल्याला पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने फोडले. यामुळे नाल्याला मोठी फट पडली आहे. या फटीतून विषारी जीवजंतू आणि पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी ओव्हरफ्लो होऊन आझाद नगर वसाहतीमध्ये शिरल्यास, येथील 20 ते 25 घरे जलमग्न होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी आझाद नगर वस्तीतील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन देऊन नाल्याची फट बुजवण्याची मागणी केली होती. तरीही अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचे वातावरण आहे. प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. परिणामी, नदी नाले ओसांडून वाहत आहेत आणि नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्यास, या फटीतून पाण्याचा प्रवाह वसाहतीमध्ये शिरून संपूर्ण परिसर आणि घरे जलमग्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मेंढा रोडवर आझाद नगर वसाहतीत सुमारे 20 ते 25 कुटुंबांचे वास्तव्य आहे. या वसाहतीला लागूनच संताजी वॉर्ड आणि आंबेडकर वॉर्डातून मुख्य नाला गेला आहे. हा नाला वैनगंगा नदीला जाऊन मिळतो. शनिवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे मेंढा रोडवरील समता नगर फेज 1 या वसाहतीत पाणी शिरले होते. त्यामुळे तुंबलेल्या नाल्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी आझाद नगर वसाहतीतील नाल्याला जेसीबीने तोडण्यात आले.
या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांना वॉर्डातील नागरिकांनी निवेदन दिले आहे. नाला तोडताना आझाद नगर वसाहतीतील नागरिकांना विश्वासात न घेता उलट धमक्यांचा प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
नाल्याची तोडलेली सुरक्षा भिंत त्वरित पूर्ववत करण्यात यावी, अन्यथा नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. निवेदनावर लक्ष्मी लीलाधर बनकर, मीरा देवदास नंदुरकर, भुनेश्वरी राऊत, नलिनी डोंगरवार, सुवर्णा ठाकरे, एकादशी आदिंनी सह्या केल्या आहेत.