मनसे ठाकरेंच्या उमेदवाराला मदत करत असल्याने राजकारणात खळबळ
अंबरनाथ / नवप्रहार डेस्क
राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू व्हायला अद्याप एक दोन दिवसांचा अवधी असला तरी राजकीय वातावरण तापले आहे. यंदा कोण कोणाच्या बाजूने हे समजणे जरा कठीण जात आहे. अंबरनाथ मध्ये तर वेगळेच व्हीतर पाहायला मिळत आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला मनसे मदत करणार असल्याचे समजते.
एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय बालाजी किणीकर यांच्या विरोधातील उमेदवाराला राज ठाकरेंच्या मनसेनं पाठिंबा जाहीर केलाय. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात मविआचे राजेश वानखेडे उमेदवार आहेत. ते मशाल चिन्हावर निवडणूक लढत असताना मनसेनं अंबरनाथमध्ये उमेदवार दिलेला नाही. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वानखडेंना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे.
मविआचे उमदेवार राजेश वानखेडे आणि कल्याणमधील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे दोघे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मनसेच्या पाठिंब्याची गॅरंटी असल्याचा विश्वास वानखेडे यांनी व्यक्त केला. माहीममध्ये शिवसेना माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळं मनसेनं अंबरनाथमध्ये पाठिंब्याची खेळी केल्याची चर्चा आता सुरु झालीय. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला राज ठाकरेंच्या पक्षानं पाठिंबा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
माहीममध्ये 3 सैनिक भिडणार :
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिम मतदारसंघातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहिममध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकरही निवडणुक लढवण्यावर ठाम आहेत. सरवणकरांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता यांच्या स्पर्धेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत सुद्धा मैदानात उतरलेत. या तीन सैनिकांमध्ये माहिमची तिरंगी लढत होणार आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड महायुती करणार अशी चर्चा होती. मात्र सदा सरवणकर निवडणुक लढवण्यावर ठाम असल्याने यांच्यात सामना होणं अटळ आहे.