विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वीचा इतिहास
राष्ट्रपिता जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीपासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला सुरवात झाल्यापासूनच सामाजिक चळवळीत आर्वीचा सहभाग राहिलेला आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या रोजनिशीत तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक बहिष्कृत भारत जनता व प्रबुद्ध भारत या सारख्या पत्रांनी सुध्दा आर्वीची नोंद घेतली आहे. आर्वीतील काही सामाजिक कार्यकर्ते खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला तसेच महात्मा गांधी यांच्या भेटी घेतल्याच्या नोंदी आहे.
आर्वी तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत ६० वर्षापेक्षा जास्त काळापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वी कार्यरत आहे.
यात अनेक अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आपला कार्यकाळ चांगला गाजवला. काही समित्यांनी एतिहासिक कार्य केले ज्यांनी नोंद आंबेडकरी साहित्याला घ्यावी लागली.
या समितीचे स्वरूप काळानुरूप बदलत गेले.
सुरवातीला खुर्चीवर फोटो ठेवून डोक्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेत आमची जुनी जेष्ठ वयोवृध्द मंडळी मिरवणूक काढायची.
नंतर गरीब असणारा वर्ग आपल्या रिक्षावर मोठया स्वाभिमानाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावत मिरवणुकीत सहभागी व्हायचा
खोब्राकिस व साखर वाटत जयंतीला पांढऱ्या निळ्या लुगडे घालत आमच्या मायमाउल्या आपल्या लेकरांना खांद्यावर घेउन जयंती मिरवणूक यायच्या नंतरच्या काळात जेव्हा बँड आले तेव्हा मग जयंती जल्लोषात साजरी होऊ लागली
शेणामातीने व निळया पांढऱ्या रंगाने रंगलेली मातीची घरे व अंगणात सजलेली रांगोळी जयंतीच्या वेळी असायची
इथून पिढी शिक्षणाच्या प्रवाहात आली शासकिय नोकरीत काम करणारे कर्मचारी आर्वी येथे येऊ लागली मग त्यांच्या मदतीने व सहकार्याने इथल्या जुन्या गुरुजी वॉर्ड दत्त वार्ड व राणी लक्ष्मीबाई वॉर्ड व गोरक्षण वॉर्ड येथे सुरवातीच्या काळात जयंती कार्यक्रमाचे आयोजन व्हायचे नंतर पुढे बाग मोहल्ला येथुन गाव नदीच्या पुरामुळे पुनर्वसित झालेले लोक आजच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे स्थायिक झाले या ठिकाणचे वयोवृध्द मंडळी व इथे नोकरी निमित्त आलेले कर्मचारी यांच्या सहयोगाने बुद्ध विहार निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली तसेच याच परिसरातील १९७० ते १९८५ पर्यंतच्या काळातील तरुण वर्ग व आर्वी शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीतून परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार झाला हनुमान वॉर्ड म्हणुन परिचित असणारा हा वॉर्ड डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणुन ओळखला जावू लागला.
आणि मग याच ठिकाणाहून भव्य मिरवणूकीला सुरवात झाली पुर्ण वॉर्ड आपली मिरवणूक घेउन या ठिकाणी जमा व्हायचे व येथेच पुर्ण शहरात फिरल्या नंतर समारोप व्हायच्या.
कालानुरूप जयंतीच्या कार्यक्रमात अनेक बदल होत गेले. हिंगणघाट व पुलगाव नंतर आर्वीचा कार्यक्रमाच्या बाबत असलेला इतिहास काही वृत्तपत्राने नोंदवून घेतला. आर्वी शहरातील जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त अनेक सुप्रसिध्द गायक व वक्ते यांनी जयंती कार्यक्रम गाजवला ज्यांच्या नोंदी पाहता येतात. आमचे मुस्लिम समाजातील तसेच आदिवासी समाजातील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयंती समितीचे काही काळ अध्यक्ष राहिलेत व त्यांनी हि मोठया प्रमाणात जयंती साजरी केल्याचे संदर्भ बघायला मिळतात.
काही अध्यक्ष सातत्याने 5 वर्ष पेक्षा जास्त काळ समितीत सक्रिय राहीले. आज बँडच्या जागी डी. जे आले रिक्षा ऐवजी शानदार गाड्या व सुंदर सजावट असणाऱ्या झांकी आल्या. आज आमच्या कडे चांगले घर, चांगले राहणीमान व आर्थिक सुबत्ता आली हे केवळ त्या महामानवाच्या जन्मामुळेच.
जयंती मध्ये आजही तिच एकात्मता व एकोपा व सर्व सहभाग याच जयंतीच्या निमित्याने बघायला मिळतो. डोळे दिपवून टाकेल इतकी गर्दी लहान मुल बाळ वयोवृध्द महिला यांचा सहभाग आर्वीसाठी प्रचंड उत्सुकता तयार करणारा ठरला. आमच्या लग्न झालेल्या मुलीही सासर वरून माहेरी यायच्या केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी.
ज्या प्रखर उन्हात साध उभ राहू शकत नाही त्याच रखरखत्या उन्हात जयंतीच्या भव्य मिरवणुकी आम्ही बघितल्या. अलीकडे रात्रीला निघणारी भव्य मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेते. याप्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे वतीने शरबत अल्पोपहार वितरण केल्या जाते.
एकूणच सामाजिक समानता व एकता डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या माध्यमातुन दिसून येते.
आज तर आर्वी शहरातील प्रत्येक वॉर्ड व तेथील जनता जयंती महोत्सव मध्ये मोठ्या तयारीने सहभागी होतात. तसेच कॉलनी मध्ये असणारा कर्मचारी शिक्षक वर्ग तितक्याच याने सहयोग करतो. तसेच श्रमिक कष्टकरी वर्ग सुध्दा आपल्या कमाईतला फार मोठा हिस्सा जयंतीसाठी खर्च करतो.
जयंती उत्सव समितिचा हा ६० वर्षापेक्षा जास्तीचा काळ चळवळीला बळ देणारा आहे.
यात सर्व वॉर्ड व तेथील मंडळ तसेच सर्व आर्वी शहरातील सर्व समूहातील बांधवांचा सहयोग फार महत्वाचा आहे. तसेच आर्थिक मदत करणारा मोठा वर्ग आजही समितीच्या पाठीशी आहे.
आपल्या आंबेडकरी चळवळीला जरी फुटिरतेचा रोग असला तरिहि आपण पुन्हा एकसंघ होउन त्यात पद्धतीने एकोपा बंधुभाव स्नेह जपुया. आपला सर्वांचा सहभाग व सर्वांची मदत नितांत गरजेची आहे.
आज तरुणाई कडे या समितीची सुत्रे येत आहे हेही फार आशादायी चित्र आहे.
सुरेश भिवगडे आर्वी