गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
भंडारा / जिल्हा प्रतिनिधी
पावसाळा सुरू होण्यास आता खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे तातडीने सुरू करावीत. जलसंधारणाची कामे करण्याची ही चांगली संधी आहे. त्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून निघणारा गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. याबाबत जनजागृती करण्यात यावी. धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ देखील होईल, असे त्यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी
भंडारा तालुक्यातील सुरेवाडा, करचखेडा, बेरोडी (पु.), व मंडणगाव येथे आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जलयुक्त शिवार योजनाच्या कामांची पाहणी केली व मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, नायब तहसीलदार राजेंद्र निंबार्ते उपस्थित होते.